Sunday 12 January 2020

तरुण आणि राजकारण


राष्ट्रीय युवा दिनाच्या दिवशी "तरुण आणि राजकारण" या विषयी माझं मत प्रगट करणे महत्वाचे वाटते. विशेष करून मागील काही दिवसा पासून भारतातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा अभ्यास केल्यास आपल्याला हे जाणवते की या सर्व घडामोडींच्या केंद्र स्थानी "युवक" आहे. आजच्या भारताची शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवकांना लक्ष करून या राजकीय व सामाजिक घडामोडी घडताना दिसत आहेत. जागतिक समाजकारणाचा आणि राजकारणाचा इतिहास बघितल्यावर आपल्याला हे जाणवत राहते की जेवढी अस्थिर युवा शक्ती तेवढे अस्थिर राज्य(राष्ट्र), या नियमाने देश अस्थिर करण्याचं प्रयत्न युवकांच्या उठावातून होताना आपल्याला दिसतो. पण त्याच वेळी एक साधा सरळ प्रश्न उभा राहतो तो म्हणजे, “युवकांनी राजकारणात यावे का?” आणि त्याला प्रतिप्रश्न असू शकतो युवकांनी राजकारणात का यावे?” माझ्या विचारांनी या दोन्ही प्रश्नांवर चर्चा होणे गरजेचे आहे व ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 


युवकांनी राजकारणात यावे का?

हो, युवकांनी राजकारणात जरूर यावे. पण याठिकाणी समाजकारण किंवा राजकारण करियर ची संधी असू शकत नाही. स्वतःचा एक विचार असणे त्या विचारला सामाजिक स्वरूप मिळवून देण्यासाठी संघटनात्मक एकत्रीकारण करणे म्हणजे राजकारण असू शकते. लोकशाही-हुकूमशाही, आंदोलन, निवडणूक, प्रचार, उमेदवार  किंवा त्याप्रकारच्या इतर गोष्टी या फक्त समाजकारण व राजकारण यातील टप्पे आहेत असे मला वाटते. राजकारणात युवकांचे स्थान फार मोलाचे आहे हे नक्की कारण त्यांच्या हातात असलेला प्रदीर्घ भविष्यकाळ आणि सोबत असलेली प्रचंड निर्माण क्षमता या जोरावर युवक राजकारणात व समाजकारणात मूलभूत बदल करू शकतात. याचे असंख्य बोलके आणि डोळ्या समोरील उदाहरणे समाजात आणि जागतिक इतिहासात दिसून येतात. तरुणानं मध्ये असणारी कल्पनाशक्ती आणि एखाद्या गोष्टी करिता झोकून देऊन काम करायची इच्छा समाजकारण आणि राजकारणा करीत खूप जरुरीची असते. स्वतंत्र असे विचार आणि प्रस्थापिता विरुद्ध बंडाची तयारी युवकांना या ठिकाणी अग्रेसर बनवते. राजकारण-समाजकारण क्लिष्ट व कंटाळवाणे असते असे काही युवकांचे मत असू शकते पण ते पारंपरिक राजकारण-समाजकारणा बद्दल असते हे त्या युवकांना लक्षत येत नसावे, मात्र स्वतंत्र आणि बंड हा याच युवकांचा स्थायी भाव असतो हे मात्र नक्की. अंगभूत गुणांना वाव मिळण्यासाठी ज्याप्रमाणे आपण योग्य मार्गदर्शन घेतो त्याच प्रमाणे युवकांना मात्र राजकारणातील योग्य दिशा दर्शवणे खूप जरुरीचे झाले आहे. विशेष करून आजच्या सामाजिक परिस्थितीत ते जरुरीचे आहे. युवकांनी राजकारणात जरूर यावे पण ते राजकारण समाज घडवण्यासाठी/ बनवण्यासाठीचे असावे. प्रबोधन-आंदोलन-बदल या तीन स्थितीतून नवं निर्मिती होत असते. आजच्या तरुणांना राजकारण आणि समाजकारणा विषयी योग्य प्रबोधनाची नक्की गरज वाटते


युवकांनी राजकारणात का यावे?

शाळा-कॉलेज मध्ये साम्यवाद शिकता असताना प्रतिकात्मक अर्धा भरलेल्या पेल्याची गोष्ट सांगितली जायची किंवा त्यालाच "आहे रे" व "नाही रे" चा वर्ग म्हटले जायचे. एकूणच राजकारणात व समाजकारणात जगाचे व युवकांचे स्थान या दोन वर्गात मोडताना दिसते. हे दोन्ही वर्ग एकमेकांना संपवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्याकरिताची राजकीय व सामाजिक आखणी मागील १०० वर्षात साम्यवाच्या उदयानंतर झालेली आहे, आजचा युवक त्याच राजकीय व सामाजिक आखणीचा अभ्यास करून राजकारण व समाजकारणात सक्रिय होऊ इच्छितो. वरील पैकी कोणत्या वर्गाचे पाईक व्हावे याचे स्वतंत्र नक्कीच आजच्या युवकाला आहे आणि स्वतंत्रपणे तो त्याचे पालन ही करत असतो हे करताना विरोधी वर्गाच्या विचारणाचे महत्व आणि सन्मान ठेवणे जरुरीचे असते हे मात्र तो कधी कधी विसरतो असे दिसते. विरोधी विचारांचे महत्व व सन्मान टिकून ठेवणे हे नवं राजकारणाचे सूत्र असणे गरजेचे आहे. युवकांनी राजकारणात का यावे याचे उत्तर जाणून घेताना हे तत्व नक्की ध्यानात ठेवावे असे वाटते. "समाजात बदलाची अपेक्षा सर्वांचींच असते पण ते अपेक्षित बदल घडवण्याची क्षमता सर्वाच्याच अंगी असते असे नाही, ती निर्माण करणे म्हणजेच समाज घडवणे असा समाज त्याच वेळी घडू शकतो जेव्हा राजकारणात व समाजकारणात दूरदृष्टीचे नेतृत्व निर्माण होते. हे नेतृत्व इतिहास व भविष्य या मधील सेतू असते, त्याला वर्तमानाच्या निर्माणाची चाहूल असते तेच समाजात बदल घडवते, असे नेतृत्व युवकांत असते. युवक नवं निर्मितीचा झरा असतात, त्यांच्यात स्व: निर्मितीची आस असते त्याकरिताचे त्यांचे प्रयत्न असतात व अपयशातून स्व प्रेरित होऊन ध्यासा कडे पुनः मार्गी होण्याची क्षमता असते. युवकांनी राजकारणात व समाजकारणात या साठी यावे की समाजाचा समतोल टिकून राहावा, समाजस दिशा मिळावी दुर्दशा नष्ट व्हावी हे युवक करू शकतात. समाजकारणातला महत्वाचा घटक राजकारण असते तसेच राजकारणातले महत्वाचे मूल्य समाजकारण असते म्हणून युवकांनी राजकारण आणि समाजकारणात आसने खूप जरुरीचे आहे. 

वंदे मातरम