Friday 11 November 2022

भारत जोडो यात्रा

 “इंडिया दॅट इज भारत इज युनियन ऑफ स्टेटस”  राज्यघटना कलम एक चा संदर्भ असलेले हे वाक्य केम्ब्रिज विद्यापीठातील एका कार्यक्रमात काँग्रेस च्या नेतृत्वाने तीन वेळा उल्लेख केला, त्यावर तेथे उपस्थित असलेल्या एका भारतीय तरुणाने त्यांना भारतीय संविधानाच्या सुरवातीला असलेल्या Preamble मधील Nation या शब्दाची आठवण करून दिली, व संविधानकर्त्यांना भारत हे एक राष्ट्र असल्याचे अभिप्रेत होते सांगितले. भारत जोडो यात्रेची मांडणी करताना वरील विचार फार महत्वाचे ठरतात.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन आता चार दिवस झाले आहेत, महाराष्ट्रातील सीमावर्ती नांदेड जिल्यामधून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करती झाली. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस देशातील राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न निश्चित करत आहे. मुळात हेच उद्दिष्ट या यात्रेचे आहे, गलितगात्र झालेल्या काँग्रेस मध्ये या यात्रे मुळे राजकीय प्राण फुंकण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. या करिता काँग्रेस चे आणि राहुल गांधी यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.

या यात्रेची सुरवात ७ सप्टेंबर रोजी केरळ राज्यातून झाली, ६० दिवसाच्या वर या यात्रेत राहुल गांधी चालत आहेत आणि दक्षिणेतील राज्य संपून आता ते मध्य भारतातील राज्यात येत आहेत. दक्षिणेतील राज्य त्यामानाने या यात्रे करिता अनुकूल आणि येथील राजकीय परिस्थिती सुद्धा काँग्रेस करता अनुकूल अशी आहे, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा येथे भाजप विरोधी राज्य सरकार आहेत तर आंध्र मध्ये प्रादेशिक पक्ष YSR काँग्रेस सत्तेत आहे, YSR काँग्रेस भाजप करिता सहयोगी आहे.  फक्त कर्नाटक राज्य भाजप शासित आहे. त्यामुळे दक्षिण भारतात यात्रे करताचा प्रवास सुखकर होता. यात्रेची खरी परीक्षा आता सुरु होत आहे, महाराष्ट्रातून ही यात्रा हिंदी बेल्ट मध्ये प्रवेश करेल. हिंदी बेल्ट मधील बहुतांश राज्य भाजप शासित आहेत व हीच राज्य देशाचा पंतप्रधान ठरवतात, विशेष करून उत्तर प्रदेश. त्यामुळे या राज्यात ही यात्रा किती प्रभावशाली ठरेल हे पाहणे जरुरीचे आहे. 


या वर्षाच्या सुरवातीला राजनीती विश्लेषक प्रशांत किशोर यांनी काँग्रेस च्या सर्वोच्च नेतृत्वा समोर काही तथ्याची मांडणी केली व काही बदल अपेक्षित केले,  त्यातील महत्वाचे बदल म्हणजे लोकशाही पद्धतीने काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक आणि काँग्रेस अंतर्गत निवडणूका, त्यासोबत प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन लोकांची काँग्रेस करिता जोडणी हे दोन प्रमुख बदल काँग्रेस नेतृत्वा समोर ठेवले गेले असण्याची शक्यता आहे. त्यातील काँग्रेस अंतर्गत निवडणुका आणि मल्लीकार्जून खरगे यांची काँग्रेस अध्यक्ष पदी दोन दशका नंतर निवड झाली तर भारत जोडो यात्रेच्या निमित्याने पदयात्रा काढून राहुल गांधी यांचे नेतृत्व सर्वसामान्य लोकं पर्यंत नेण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. या पूर्वी सुद्धा ९० च्या दशकात व त्यांनतर २००४ च्या निवडणुकी पूर्वी लाला कृष्ण आडवाणी यांनी रथ यात्रा काढली होती आणि त्याचा प्रचंड प्रभाव जन सामन्यात निर्माण झाला होता. देशाचं राजकारण ढवळून निघाले होते व भाजप देशाच्या राजकारणात सत्ता केंद्रित पक्ष झाला होता. देशातील सर्व माध्यम समूहांनी त्यावेळी रथ यात्राचे स्पेशल कव्हरेज केले होते. लाला कृष्ण अडवाणी यांची रथ यात्रा सर्व सामान्य लोकांच्या चर्चेचा विषय झाली होती. या रथ यात्रे द्वारे निवडणुकीचे मुद्दे भाजपा ने योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहंचवले होते. त्या मुद्द्यांचा प्रभाव लोकांमध्ये दिसत होता व त्याचे रूपांतर नंतर मतदानात झाले. लाला कृष्ण अडवाणी यांच्या रथ यात्रेचा वाढता प्रभाव पाहून बिहार मधील लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने ती रथ यात्रा अडवली आणि अडवाणी यांना अटक केली.

२०२४ ची तयारी म्हणून या यात्रे कड़े नक्कीच पाहावे लागेल, हि यात्रा १५० दिवसांनी फेब्रुवारी २०२३ ला काश्मीरमध्ये संपेल तेव्हा  देशातील सार्वत्रिक निवडणुकीला फक्त सव्वा वर्ष राहिलेले असेल, अर्थात भाजपने सुद्धा २०२४ च्या निवडणुकीची तयारी नक्कीच सुरु केली आहे. २०१२ च्या हिवाळ्यात अण्णा हजारे यांचे लोकपाल विधेयकाचे आंदोलन दिल्लीत सुरु झाले. अण्णांच्या या आंदोलनाचा फायदा नंतरच्या काळात भाजपाला झाला. ते आंदोलन सर्व व्यापी झाले, भ्रष्टाचार हा विषय लोकांनी लावून धरला आणि तत्कालीन केंद्र सरकार विरुद्ध देश व्यापी आंदोलन उभे राहिले. या आंदोलनात समाजातील सर्व स्थरातील लोक सहभागी झाले आणि अण्णा हजारे यांच्या उपोषणाला समर्थन दिले. हे आंदोलन यशस्वी होण्यामध्ये त्यावेळेस माध्यमांनी विशेष भूमिका बजावली. त्या प्रमाणेच काँग्रेस या भारत जोडो यात्रेच्या निमित्याने केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. देशभर या यात्रेच्या माध्यमातून चळवळ उभी करणायचा प्रयत्न सुरु आहे. मात्र या यात्रेस अजून सुद्धा म्हणावे तसे जन आंदोलनाचे स्वरूप आलेले नाही आणि अजून सुद्धा सर्वसामान्य भारतीय या यात्रेत जोडले गेलेले नाहीत.

या यात्रेच्या निमित्याने वातावरण निर्मितीचा काँग्रेस चा प्रयत्न आहे पण अजून तरी या यात्रेचा प्रभाव सर्वसामान्य भारतीयांच्या मनावर झालेला दिसत नाही. या यात्रेच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्व सहभागी झालेले दिसतात ज्यात प्रादेशिक पक्षांचे नेते, अभिनेते, कलाकार, लेखक, धर्मगुरू, समाज सेवक आणि समाजात प्रभाव निर्माण करणारे लोक उपस्थित आहेत पण सामान्य भारतीय अजून सुद्धा या यात्रे पासून काही अंतर राखून आहे असे दिसते. देशातील प्रमुख माध्यमे सुद्धा या यात्रे बद्दल फार चर्चा करताना दिसत नाहीत. सोशल मीडिया सारखे प्रभावी माध्यम असताना सुद्धा काही मोजकेच पत्रकार या यात्रे बद्दल लिहताना दिसत आहेत तर काही मोजकीच व्यक्तिमत्व या यात्रेत सहभागी होत आहेत.

या यात्रेचे अनेक फायदे काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळात होऊ शकतात, त्यातील एक महत्वाचा फायदा म्हणजे राहुल गांधी यांचे देशव्यापी नेतृत  प्रस्थापित करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. त्याच बरोबर काँग्रेस तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व स्वीकारणार नाही हे या यात्रेतून काँग्रेस ने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय स्थरावर विरोधी पक्षांचे नेतृत्व काँग्रेस च करेल हे ठामपणे काँग्रेस ने सांगितले आहे. या यात्रे च्या निमित्याने राहुल गांधी यांना देशातील सर्व सामान्य भारतीयां पर्यंत पोहंचता येईल. आपले विचार सर्व सामान्य भारतीयां पर्यंत पोहंचता येतील. या यात्रे मध्ये राहुल गांधी यांनी स्वतःचा लुक सुद्धा बदलेल दिसत आहे.

हि यात्रा सुरु असतानाच गुजरात व हिमाचल प्रदेश या राज्यात निवडणूक होत आहेत. हि दोन्ही राज्य भाजप शासित आहेत, निवडणुकीचा निकाल ही यात्रा संपण्याच्या आत येणार आहे. ही यात्रा गुजरात मध्ये प्रवेश करत असताना तेथील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहंचला असेल. या यात्रेचा परिणाम निवडणूक निकालावरती काय होतो आणि ही यात्रा काँग्रेस करिता किती मतदान मिळवण्यास मदत करते हे पाहणे गरजेचे आहे. 


वंदे मातरम 

विराज वि देवडीकर