Monday 2 October 2023

बापू, शास्त्री आणि मी

 


माझा जन्म ९० च्या दशकातला, बापू आणि शास्त्री जी सव्वा शतक अगोदर जन्मलेले, आमच्यात एक पिढी, दोन पिढी नव्हे तर चार पाच पिढ्यांचा जनरेशन गॅप, त्यामुळे आमचा एकमेकांशी प्रत्येक्ष असा संपर्क नाहीच. त्यात मी काँग्रेसी विचारांचा नाहीच त्यामुळे बापू आणि शास्त्री जी यांची भेट पुस्तकांतूनच झाली. बापूंची पहिली ओळख डोळ्यावर गोल चष्मा, डोक्यावर टक्कल, हातात काठी, पडलेली दात,  गुडघ्या पर्यंत धोतर आणि अंगात पंचा नेसलेला एक म्हतारा अशीच झालेली. शालेय शिक्षणात भारताला स्वातंत्र्य गांधीजीं मुळे मिळाले वाटायचे पण स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यावेळी माहित नसल्यामुळे ते कोणामुळे मिळाले याचे फार कुतूहल नव्हते. दुसऱ्यांदा बापू भेटले  Richard Attenborough दिग्दशित आणि Ben Kingsley च्या  १९८२ साली आलेल्या "गांधी" चित्रपटातून, हा चित्रपट सुद्धा माझ्या जन्मापूर्वीचा पण नंतर समजत्या वयात पहिला आणि बापू वेगळेच भेटले. जोहान्सबर्ग च्या रेल्वे स्टेशन वर रेल्वेतून अपमानित करून बाहेर काढलेला एक वकील ते भारतीय स्वातंत्र्य युद्धातील नेते (गांधीजींना युद्ध हा शब्द मान्य होईल का नाही माहित नाही) अशी ओळख झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील प्रत्येक व्यक्तिमत्वां सोबत गांधीजी वेगवेगळे सापडायला लागले. नेहरू सोबतचे बापू वेगळे, सुभाष म्हणून नेताजींना बोलवणारे गांधीजी वेगळे, टिळकांचा मार्ग वेगळा हे म्हणणारे मोहनदास वेगळी, बाबासाहेबांच्या सोबत पुणे करार करणारे गांधीजी वेगळे किंवा सावरकरांना अमान्य असणारे गांधीजी वेगळे, प्रत्येक व्यक्तिमत्वा सोबत मला वेगळे बापू भेटले. गांधी जींचं तत्वज्ञान ज्याला आता गांधीगिरी म्हटलं जात (दादागिरी शी यमक जुळणारे हे सुद्धा बापुना मान्य होईल का नाही माहित नाही) प्रत्येकाने वेगळे मांडले आहे. कोणाचे गांधीजी कष्टकऱ्यांचे आहेत, कोणाचे बापू अस्पृश्यांचे आहेत (गांधी जींचा शब्द "हरिजन" हरी चे जण) कोणाचे बापू शेतकऱ्यांचे आहेत, कधी गिरणी कामगारांचे आहेत, कधी मुसलमानाचे आहेत, कधी हिंदूंचे आहेत, बापू ग्राम उद्योगातून निर्मिती करत आहेत, बापू कापसा पासून सूत काढत तर आम्ही संघीचे सेवा व्रत मानणारे आहेत. राजकीय गांधीजी  कधी गांधीजी गोलमेज परिषदेत भेटतात, कधी इर्विनग करारात दिसतात. एक ना अनेक रूपे बापूंची भेटली पण बापू भावले ते त्यांच्या हट्टी निग्रही स्वभावात, गांधीजी त्यांचा तत्वा बद्दल हट्टी होते. ते कधीच स्वतःच्या विचारांना मुरड घालत नसत. गांधीजींच्या सत्याच्या आग्रह बद्दल मी फार आशावादी नाही, सत्याला सुद्धा स्थल, कालच्या मर्यादा आहेत. युनिव्हर्सल ट्रूथ सुद्धा स्थल काल बदलल्या वर असत्या ठरते त्यामुळे पूर्ण सत्य किंवा पूर्ण असत्य असे काही असत नाही. आणि म्हणूनच स्वतःच्या विचारांशी निश्चयी बापू मी खूप स्वीकारतो. माझे विचार मला मान्य आहेत आणि मी ते स्वीकारलेत हा विश्वास गांधीजी मला देतात. सत्याच्या बाबतीत ज्याप्रमाणे मी आग्रही नाही त्या प्रमाणे अहिंसा सुद्धा मला वाटते. अहिंसा हे गांधीजींचे पूर्णपणे राजकीय अस्त्र होते. आता अहिंसे बद्दल फार मी बोलणार नाही. गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्यातील सामान धागा म्हणजे त्यांचे "सामान्यपण", सामान्य माणसात "असामान्य" शक्ती असते हे गांधीजी आणि शास्त्रीजी यांनी दाखून दिले. दोघांचे विचार  सामान्य होते पण ते सर्वमान्य झाले, "वक्तृत्त्व" सामान्य होत पण त्यामुळे करोडो भारतीयांना प्रेरणा मिळाली, असंख्य भारतीयांना दिशादर्शक वक्तृत्त्व त्याचे होते. बापूंच्या सामान्य भाषेतून चंपारण्याचा शेतकरी लढा उभा राहिला तर सौराष्ट्रातल्या मीठ  उत्पादकांसाठी पायी यात्रा निघाली.

बापू पासून प्रेरित झालेल्या अनेक पिढ्या आमच्या मराठवाड्यात आहेत, आज सुद्धा आमच्या ग्रामीण घरात गांधीजींच्या तस्बिरी पासून अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या तसबिरी असतात, मात्र  नंतरच्या काळात बदल झाले जसे विचार आणि विचारधारा बदलल्या तसे आद्य पुरुष सुद्धा बदलले पण बापू कायम होते. कोण्या एका निर्बुद्ध व्यक्तीने बापुना संपवल्याचे सांगितले जाते पण भारताच्या इतिहासातील अनेक व्यक्तिमत्व गांधीजींमुळेच जिवंत आहेत. बापू संपत नसतात.

 

गांधी जी आणि लाला बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन

 

 

विराज वि देवडीकर

Sunday 10 September 2023

डिनर डीप्लमसी

मागच्या आठवड्यात राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव यांचा मटण बनवतानाच एकत्रित व्हिडीओ यु ट्यूब वर आला होता. काही वेळातच या व्हिडीओ ला अनेकांनी पहिले व त्याची संख्या काही लाखात पोहंचली. डिनर डीप्लमसी च्या नवा खाली राजकीय बांधणी अराजकीय व्यासपीठावरून होत आली आहे, त्याचीच उजळणी या व्हिडिओतून दिसते. मतदारांवरती प्रभाव निर्माण करणे व त्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या पोटातून मना पर्यंत पोहंचण्या करता डिनर डीप्लमसी असते. या व्हिडिओत राहुल गांधी लालू प्रसाद यादव यांच्या घरी जाऊन मटण चंपारण पद्धतीने (बिहारी)  शिजवताना दिसत आहे. या मटणाची रेसेपी लालू प्रसाद यादव राहुल गांधींना सांगतात आणि राहुल जी त्या प्रमाणे मटण करतात. त्यानंतर एकत्रित त्या मटणाचे जेवण राहुल जी, लालूजी करतात. सोबत जेवताना अराजकीय प्रकारे  राजकीय मत प्रदर्शित करतात, राहुल जी एकप्रकारे लालू प्रसाद यादव यांची मुलाखत घेतात. या व्हिडिओत राहुल गांधी लालू जी ना विचारतात, " जेवण बनवणे आणि राजकारण यात फरक काय आहे? तुम्ही यात सर्व एकत्रित केले आणि राजकारणात सुद्धा !" यावर लालू जी उत्तर देतात "सर्वकाही एकत्रित केल्या शिवाय राजकारण होऊच शकत नाही". त्यानंतर राहुल गांधी लालू जीना सध्याच्या राजकीय परिस्थिती वरती प्रश्न विचारतात आणि लालू जी त्यांच्या स्टाईल मध्ये उत्तर देतात, अर्थात त्यांच्या टीकेचा रोख केंद्रातील भाजप सरकार वरती असते. 


हे नक्की कि हा प्रचाराचा भाग आहे, योग्य प्रकारे त्याची मांडणी केली आहे. लोकांवरती सामान्य मतदारावरती त्याचा प्रभाव निर्माण होईल अशी योजना त्यातून दिसून येते. या पूर्वी सुद्धा राजकारण्यांनी स्वतःच्या हातून स्वयंपाक करणे किंवा जेवण करणे व त्याचा वापर राजकीय प्रचारा करता करणे सामान्य आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत भरलेल्या एका प्रदर्शना मध्ये पंतप्रधानांनी लिट्टी चोखा हा बिहार मधील शाकाहारी पदार्थाचा स्वाद घेतला. याच काळात बिहार मध्ये विधानसभेच्या निवडणूक होत्या व बिहार मधील मतदारांना आकर्षित करण्यासाठीच पंतप्रधानांनी लिट्टी चोखा खाल्ले असा आरोप विरोधकांनी केला होता. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पंतप्रधान निवासस्थानात कायम समोसा चटणी, फापडा जिलेबी या शाकाहारी पदार्थांचा नाश्ता असायचा नंतर डॉ मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यावर त्यात बदल झाला व वेस्टर्न नाश्त्याची सोया करण्यात आली. संजय बारू लिखित "an accidental prime minister" या पुस्तकात त्याचा संदर्भ सापडतो. वाजपेयी आणि अडवाणी यांच्यात जेव्हा-जेव्हा मतभेद व्हायचे तेव्हा अडवाणी वाजपेयी ना भोजनाचे आमंत्रण द्यायचे आणि भोजनात त्यांच्या आवडीची  "सिंधी कढी" असायची, अटल बिहारी वाजपेयी चा विरोध कढी च्या झुरक्या सोबत मावळून जायचा. 


महाराष्ट्रात शिवसेना भाजप सरकारने स्व बाळासाहेबांच्या आदेशावरून झुणका भाकर केंद्र सुरु केले आणि अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला व महाराष्ट्राच्या राजकारणात पोटातून मनात शिरण्याचा पहिला प्रयोग झाला. दक्षिणेत सुद्धा "अम्मा किचन" या नावाने जयललिता मुख्यमंत्री असताना अल्पदरात खानावळ सुरु करण्यात आल्या व त्याद्वारे मतदारांवरती प्रभाव निर्माण करण्यात आला. नरेंद्र मोदी सरकारने सुद्धा जागतिक पातळीवर तृणधान्य चा आहारातील वापर प्रसाराचे कार्य केले. युक्रेन रशिया युद्ध मुळे निर्माण झालेल्या गव्हाच्या टंचाईला तृणधान्य चे उत्तर भारताने दिले. सध्या चालू आलेल्या G20 बैठकीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर तृणधान्यांच्या पदार्थाची रेलचेल होती.  

राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव यांनी एकत्रित केलेल्या मटणाला सुद्धा अजून एक वेगळी राजकीय चव आहे ती म्हणजे, भाजप ने व भाजपच्या नेत्यांनी कायम  शाकाहारी जेवणाचा पुरस्कार केला आहे. याचा अर्थ भाजपचा मांसाहारी जेवणाला विरोध आहे असे नाही पण  भारतीय जीवन पद्धतीत शाकाहारी जेवण अशी मांडणी भाजपा तर्फे केली गेली, कित्तेक भाजप नेते सार्वजनिक रित्या शाकाहारी असल्याचे सांगतात व शाकाहाराचे सेवन करतात. त्याला उत्तर म्हणून राहुल गांधी व लालू प्रसाद यादव यांनी मांसाहारी जेवण सार्वजनिक रित्या बनवले सुद्धा आणि त्याचे भोजन सुद्धा केले. राहुल गांधी यांच्या या कृती मुळे सामान्य मतदार INDIA आघाडी कडे किती आकर्षित झाले व त्याचे रूपांतर मतात होईल का नाही ते माहित नाही मात्र त्यांच्या पोटात शिरण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी नक्की केला आहे.

 

धन्यवाद

 

विराज वि देवडीकर

Sunday 21 May 2023

'कर नाटक' आणि ऑपरेशन लोटस

 

आज कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी झाला, स्पष्ट बहुमतातील काँग्रेस चे सरकार स्थापन झाले. सिद्धरामय्यां यांनी मुख्यमंत्री तर डी के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपत घेतली. आठ दिवसा खाली कर्नाटक विधानसभेचा निकाल लागला व त्यात भाजपा ला धोबीपछाड देत काँग्रेस ने स्पष्ट बहुमत मिळवले आणि एकहाती सत्ता स्थापन केली. नक्कीच सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांचे  या विजया बद्दल अभिनंदन करायला हवे आणि भाजपाने अपयशाचे चिंतन करायला हवे. भाजपाचा एकूणच प्रचार या कर्नाटक निवडणुकीत मतदारांना आकर्षित करणारा नव्हता एवढे निश्चित. तूर्तास भाजपाच्या पराभवा बद्दल एवढेच.

ही निवडणूक जिंकून सुद्धा काँग्रेस मधील आत्मविश्वास अपूर्ण दिसत आहे. मागील आठ दिवसा पासून काँग्रेस मध्ये कर्नाटका मधील सत्ता प्रमुख बनण्यासाठी जी चढा-ओढ लागली आहे त्यावरून असे दिसते कि काँग्रेस मागील काही वर्षाच्या इतिहासातून काही ही शिकली नाही. म्हणजे एकाच सरकार मध्ये दोन सत्ता केंद्र हे काँग्रेस चे जुने गणित या नवीन सरकार मध्ये सुद्धा कायम आहे. इतिहासात पहिले तर लक्षात येईल की राजस्थान मधील सत्ता संघर्ष कायम आहे गहिलोत विरुद्ध पायलट ही निवडणूक सूरु असताना सुद्धा राजस्थान मधील काँग्रेस अस्थिर होती. स्वतः पंतप्रधान त्यांच्या राजस्थान मधील जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री गहिलोत यांच्या समोर या अस्थिर ते बद्दल बोलले आहेत. मध्य प्रदेशात तेच झाले कमलनाथ विरुद्ध सिंधिया यात सिंधीया यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेस चे सरकार गेले. आसाम मध्ये तरुण गोगई विरुद्ध हेमंत बिस्वा सरमा यात सुद्धा सराम यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेस च्या हातून आसाम निसटले, मागील दोन सलग निवडणुकीत भाजप आसाम मध्ये सत्तेत आली आहे. पंजाब चे तर त्याच्या पुढचे आहे, डॉ अमरिंदर सिंह विरुद्ध नवज्योत सिंह सिद्धू . ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंजाब मध्ये मुख्यमंत्री बदलला आणि सिद्धू यांच्या हातातील कटपुटली नेतृत्व काँग्रेस ने दिले. मागासवर्गीय असे आवरण असलेलं नेतृत्व पंजाब मध्ये काँग्रेस ला टिकवू शकले नाही. त्याचे प्रत्यंतर म्हणून  पंजाब मधून काँग्रेस चा सुपडा साफ झाला व आप चे सरकार स्थापन झाले. पाकिस्थान सीमेशी लागून असलेल्या राज्यात काँग्रेस च्या चुकीच्या निर्णया मुळे आज खलिस्थान समर्थक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फायदा पाकिस्थान नक्की घेत आहे. छत्तीसगड मध्ये सुद्धा अशीच कहाणी आहे. मुख्यमंत्री भूपेश बहेल विरुद्ध टी एस  सिंग देव यांच्यात वाद आहे. काँग्रेस शासित राज्यांची सध्याची ही स्थिती आहे.

महाराष्ट्रात सुद्धा ये पेक्षा वेगळे घडलेले आपल्याला दिसत नाही यशवंतराव, वसंत दादा पाटील किंवा वसंतराव नाईक यांचा काळ काय किंवा विलासराव देशमुख यांच्या पासून ची सुरवात काय, हीच स्थिती पहायला मिळते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना प्रभा राव प्रदेश अध्यक्ष होत्या व त्यांच्या रूपाने राज्यात दुसरे सत्ता केंद्र निर्माण झाले होते. तीच परिस्थिती अशोकराव चव्हाण विरुद्ध माणिकराव ठाकरे अशी होती तर नंतर पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यात होती. महाराष्ट्रात या प्रत्येक सरकार चे पाय ओढण्याचे काम त्याच सरकारच्या प्रदेश प्रमुख्याने केलेले दिसते. एकवढेच काय नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पद सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार गेले असे सुद्धा काही विधिमंडळ तज्ञ सांगत आहेत. मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी विधानसभा अध्यक्ष पद रिक्त होते व ते काँग्रेस च्या नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे.

काँग्रेस स्वतःच्याच नेतृत्वाला चेक देणारे प्रति नेतृत्व निर्माण करते आणि त्यातून काँग्रेस च्या एकूणच राजकारणाच्या ऱ्हास होते. काँग्रेस ने कर्नाटकात जे केले त्यातून ऑपरेशन लोटस ला खतपाणी मिळणार आहे. भाजप निश्चितच या सरकार मधील कमकुवत दुवा हुडकण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्याद्वारे हे सरकार भाजपा ला पडणे सोपे जाईल. या दोन सत्ता केंद्रा मुळे भाजपा ला ऑपरेशन लोटस करण्यासाठी मदतच मिळणार आहे. भाजपा सारखी महाशक्ती विरोधात असताना काँग्रेस ने स्वतःच्या चुका मधून शिकणे गरजेचे आहे. २०२४ नंतर भाजप पुन्हा केंद्रात सत्तेत आल्यास "कर-नाटकाचा" दुसरा अंक सुरु होईल एवढे निश्चित...

 

धन्यवाद

 

विराज वि देवडीकर