Tuesday 10 May 2022

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी

 

#चष्म्यातून_इतिहास, #१८५७चे_स्वातंत्र्यसमर, #वीर_सावरकर

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी आजच्या दिवशी, १० मे १८५७ साली पडली,

 

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी विरुद्ध भारतीय जवानांनी पुकारलेल्या लढ्याला आज १६५ वर्ष पूर्ण झाली. "शिपायांचे बंड" म्हणून ब्रिटिश व डाव्या विचारसरणीने  हिणवले गेलेल्या स्वातंत्र्य संग्रामाला सणसणीत चपराक म्हणून वीर सावरकरांनी हे `बंड' नव्हे, तर भारताचे पहिले `स्वातंत्र्ययुद्ध' होते, हे ऐतिहासिक पुराव्यांसह सप्रमाण सिद्ध केले. हुतात्मा मंगल पांडे, नानासाहेब पेशवे, तात्या टेपे या सारख्या असंख्य वीरांनी कंपनी सरकारला सशस्त्र विरोध केला होता. त्यावेळेसच्या भारताच्या वेगवेगळ्या भागात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या प्रदेशात युद्धाचा भडका उडाला, मेरठ येथील लष्कराच्या छावणीत भारतीय सैनिकांनी बंड केले. मेरठ छावणी उत्तर भारतातील सर्वात महत्वाची आणि मोठी छावणी होती, या छावणीत देशी शिपाई व गोरे सैनिक जवळपास समप्रमाणात होते. 


कंपनीने आणलेल्या नव्या हातबॉम्बची प्रात्यक्षिके ९ मे १८५७ रोजी दाखवण्यात आली.  असे हातबॉम्ब हाताळण्यास बहुतांश हिंदी शिपायांनी असहमती दर्शवली. त्यामुळे संतापलेल्या गोऱ्या सार्जंटने त्यांची वर्दी उतरवली व त्यांची अपमानासपद धिंड काढली. त्यांचे तातडीने कोर्टमार्शल करण्यात आले व त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. यामुळे कमालीची अस्वस्थता पसरली. दुसऱ्या दिवशी, १० मे रोजी रविवार होता. अनेक गोरे अधिकारी कुटुंबियांसहीत चर्चमध्ये वा बाजारहाटीला गेले होते. तीच वेळ साधून हिंदी शिपायांनी उठाव केला व छावणीतील गोऱ्या सैनिकांवर हल्ला करुन तुरुंगात डांबलेल्या अनेक शिपायांना मुक्त केले. नंतर त्यांनी बाजाराकडे कूच करुन तिथेही गोऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसह चोप दिला.

हा उठाव पाहून नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, बहाद्दुरशहा जाफर, राणी लक्ष्मीबाई या व अशा वीरांनी अनेक ठिकाणी कंपनी सरकार विरुद्ध युद्ध पुकारले. हा लढा पुढे वर्ष भर वेगवेळ्या लढयातून सुरु राहिला पण यशस्वी होऊ शकला नाही. या उठावा मुळे कंपनी सरकारचा कारभार जाऊन भारतातात ब्रिटनच्या राणीचे साम्राज्य आले. या उठावा मुळे ब्रिटिश राज्यकर्ते भारतीय समाजा बद्दल व समाज व्यवस्थेबद्दल अधिक जगरुक झाले. हाच उठाव त्यानंतरच्या भारतीय स्वातंत्र्या करिताच्या अनेक लढायांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यातून लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, वीर सावरकर या सारख्या प्रमुख नेत्याबरोबरच चापेकर बंधू, भगत सिंह, सुखराम, राजगुरू, कान्हेरे खुदिराम बोस असे क्रांतिकारक पुढे आले व ९० वर्षांच्या लढ्यानंतर भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला.


या लढ्यात महाराष्ट्रातील औंध संस्थानाने सहभाग घेतला व कंपनी सरकार विरुद्ध लढा दिला, दक्षिण भारतात इतरत्र हा उठाव झालेला दिसत नाही, बंगाल या उठावा पासून अलिप्त राहिले तर पंजाब कंपनी सरकारच्या समर्थनात उतरले. त्यामुळे लोकमान्यांनी या उठावाचे वर्णन करताना "हिंदुस्थानी वेगवेगळे लढले म्हणून हरले" अशा प्रकारे केले आहे. 

विराज वि देवडीकर