Showing posts with label Savarkar. Show all posts
Showing posts with label Savarkar. Show all posts

Tuesday, 10 May 2022

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी

 

#चष्म्यातून_इतिहास, #१८५७चे_स्वातंत्र्यसमर, #वीर_सावरकर

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी आजच्या दिवशी, १० मे १८५७ साली पडली,

 

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी विरुद्ध भारतीय जवानांनी पुकारलेल्या लढ्याला आज १६५ वर्ष पूर्ण झाली. "शिपायांचे बंड" म्हणून ब्रिटिश व डाव्या विचारसरणीने  हिणवले गेलेल्या स्वातंत्र्य संग्रामाला सणसणीत चपराक म्हणून वीर सावरकरांनी हे `बंड' नव्हे, तर भारताचे पहिले `स्वातंत्र्ययुद्ध' होते, हे ऐतिहासिक पुराव्यांसह सप्रमाण सिद्ध केले. हुतात्मा मंगल पांडे, नानासाहेब पेशवे, तात्या टेपे या सारख्या असंख्य वीरांनी कंपनी सरकारला सशस्त्र विरोध केला होता. त्यावेळेसच्या भारताच्या वेगवेगळ्या भागात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या प्रदेशात युद्धाचा भडका उडाला, मेरठ येथील लष्कराच्या छावणीत भारतीय सैनिकांनी बंड केले. मेरठ छावणी उत्तर भारतातील सर्वात महत्वाची आणि मोठी छावणी होती, या छावणीत देशी शिपाई व गोरे सैनिक जवळपास समप्रमाणात होते. 


कंपनीने आणलेल्या नव्या हातबॉम्बची प्रात्यक्षिके ९ मे १८५७ रोजी दाखवण्यात आली.  असे हातबॉम्ब हाताळण्यास बहुतांश हिंदी शिपायांनी असहमती दर्शवली. त्यामुळे संतापलेल्या गोऱ्या सार्जंटने त्यांची वर्दी उतरवली व त्यांची अपमानासपद धिंड काढली. त्यांचे तातडीने कोर्टमार्शल करण्यात आले व त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. यामुळे कमालीची अस्वस्थता पसरली. दुसऱ्या दिवशी, १० मे रोजी रविवार होता. अनेक गोरे अधिकारी कुटुंबियांसहीत चर्चमध्ये वा बाजारहाटीला गेले होते. तीच वेळ साधून हिंदी शिपायांनी उठाव केला व छावणीतील गोऱ्या सैनिकांवर हल्ला करुन तुरुंगात डांबलेल्या अनेक शिपायांना मुक्त केले. नंतर त्यांनी बाजाराकडे कूच करुन तिथेही गोऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसह चोप दिला.

हा उठाव पाहून नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, बहाद्दुरशहा जाफर, राणी लक्ष्मीबाई या व अशा वीरांनी अनेक ठिकाणी कंपनी सरकार विरुद्ध युद्ध पुकारले. हा लढा पुढे वर्ष भर वेगवेळ्या लढयातून सुरु राहिला पण यशस्वी होऊ शकला नाही. या उठावा मुळे कंपनी सरकारचा कारभार जाऊन भारतातात ब्रिटनच्या राणीचे साम्राज्य आले. या उठावा मुळे ब्रिटिश राज्यकर्ते भारतीय समाजा बद्दल व समाज व्यवस्थेबद्दल अधिक जगरुक झाले. हाच उठाव त्यानंतरच्या भारतीय स्वातंत्र्या करिताच्या अनेक लढायांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यातून लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, वीर सावरकर या सारख्या प्रमुख नेत्याबरोबरच चापेकर बंधू, भगत सिंह, सुखराम, राजगुरू, कान्हेरे खुदिराम बोस असे क्रांतिकारक पुढे आले व ९० वर्षांच्या लढ्यानंतर भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला.


या लढ्यात महाराष्ट्रातील औंध संस्थानाने सहभाग घेतला व कंपनी सरकार विरुद्ध लढा दिला, दक्षिण भारतात इतरत्र हा उठाव झालेला दिसत नाही, बंगाल या उठावा पासून अलिप्त राहिले तर पंजाब कंपनी सरकारच्या समर्थनात उतरले. त्यामुळे लोकमान्यांनी या उठावाचे वर्णन करताना "हिंदुस्थानी वेगवेगळे लढले म्हणून हरले" अशा प्रकारे केले आहे. 

विराज वि देवडीकर

 

Tuesday, 13 April 2021

आद्य सरसंघचालक प्रणाम

 

संघ निर्माते : डॉ केशव बळीराम हेडगेवार

आज परम पूज्य आद्य सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती, त्यांचा जन्म १ एप्रिल १८८९ रोजी नागपूर ला झाला. हिंदू तिथी नुसार त्यांचा जन्मदिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी झाला. त्यांनी हिंदूंचे विश्वव्यापी संघटन निर्माण केले व मागील ९७ वर्ष हे संघटन अविरत व्यक्ती निर्माणचे कार्य करत आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरला झाले तेथेच त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे व समाजकार्याचे संस्कार झाले. त्यांच्या जीवनावर त्यांचे थोरले बंधू महादेव शास्त्री यांचा प्रचंड प्रभाव होता. व त्यांच्याच माध्यमातून क्रांतिकार्याची ओळख डॉक्टरांना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रचंड प्रभाव डॉक्टरांवरती होता, त्यातूनच स्वातंत्र्य प्राप्ती करता सशस्त्र लढ्याची प्रेरणा त्यांना मिळाली. बालपणी मित्रांसोबत नागपुरातील सीताबर्डी किल्ल्या वरचा "युनियन जॅक" काढून त्याठिकाणी भगवा ध्वज त्यांनी लावला.


पुढे कलकत्ता मेडिकल कॉलेज मध्ये MBBS करिता त्यांनी ऍडमिशन घेतले आणि तेथेच ते बंगाल मधील क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. ते अनुशीलन समितीचे सदस्य बनले. त्यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून त्यांच्यावर हिंदू महासभेच्या बंगाल प्रांताच्या उपाध्यक्ष म्हणून जवाबदारी देण्यात आली. पुढे MBBS प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर स्वगृही नागपूरला परत आल्यावर त्यांनी सरकारी नोकरी न करिता क्रांतिकार्य सुरु ठेवले. याच काळात ते काँग्रेस च्या संपर्कात आले व काँग्रेस चे सदस्य झाले. १९२० ला काँग्रेस चे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर ला झाले त्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्याच बरोबर त्यांनी "पूर्ण स्वातंत्र्याचा" ठराव या अधिवेशनात मांडला पण तो पास होऊ शकला नाही. डॉक्टर काँग्रेस च्या जहाल गटाचे सदस्य होते, त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रचंड प्रभाव होता टिळकांच्या अकाली निधना मुळे काँग्रेस मधील जहाल गट कमकुवत झाला होता. १९२१ मध्ये त्यांनी असहकार आंदोलनात सत्याग्रह केला व एक वर्ष कारावास सुद्धा भोगला होता. पण त्याच बरोबर त्यांनी गांधीजींच्या खिलाफत आंदोलनाला तीव्र विरोध केला. तुर्कीस्तानच्या राजा करिता भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा वापर करणे त्यांना मान्य नव्हते.


सक्षम राष्ट्रा करिता सक्षम समाज निर्माण होणे गरजेचे आहे. हिंदू समाजाला संघटित, अनुशासित आणि बलशाली होणे अत्यंत आवश्यक आहे. व ते कार्य संघ शाखेत केले जाते या उद्देशातून १९२५ च्या विजयादशमी च्या दिवशी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघ स्थापने वेळी त्यांचे वाक्य होते,  ‘’मैं आज संघ (संगठन) की स्थापना की घोषणा करता हूं‘’ एक वर्षांनी या संघटनेचे "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" हे नमःकारण करण्यात आले. संघ स्थापने पासून पुढे १५ वर्ष त्यांनी संघाचे सरसंघचालक म्हणून जवाबदारी स्वीकारली. या काळात त्यांनी संघ भारत भर नेला, त्याकरिता अखंड प्रवास, भारत भ्रमण, अनेक व्यक्तीना भेटणे व त्यांना संघाशी जोडून घेण्याचे काम त्यांनी केले. स्वकृतीतून त्यांनी अनेकदा स्वयंसेवकांना शिस्तीचे धडे दिले. १९४० पर्यंत संघ भारत भर पोहंचला होता, १९४० च्या तृतीय वर्षां वर्गाच्या स्वयंसेवकांसमोर आपल्या शेवटच्या बौद्धिकात बोलताना त्यांनी म्हटले होते, " मी हिंदुराष्ट्राचे छोटे रूप तुम्हा सर्वात पाहत आहे"

 

संघे शक्ति: इति ज्ञात्वा लोककल्याणकारक:| येन संघ कृतस्तस्मै केशवाय नमो नमः ||

 

अर्थात “संघटनेमध्ये सामर्थ्य असते, हे ओळखून लोकांचे कल्याण करणारा संघ ज्यांनी स्थापन केला, अशा त्या केशवांना पुनः पुनः नमस्कार असो.”

 

आद्य सरसंघचालक प्रणाम

Saturday, 30 January 2021

गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी

 ३० जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळी दिल्ली येथील बिर्लाभवन मध्ये प्रार्थनेच्या अगोदर एका माथेफिरू तरुणाने महात्मा गांधी यांची गोळी झाडून हत्या केली, नथुराम गोडसे असे त्या माथेफिरू तरुणाचे नाव, त्याच्या सोबत नारायण आपटे आणि उर्वरित पाच जणांना या हत्येच्या कटात शिक्षा झाली. मात्र महात्मा गांधी यांच्या हत्येत सहभाग असल्याच्या आरोपाखाली विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी मागील अनेक दशकांपासून सुरु आहे. या हत्येचा अभियोग दिल्ली येथील लाल किल्ल्यात स्थापन झालेल्या विशेष न्यायालयात चालला, न्यायालयाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना निर्दोष ठरवून मुक्त केले होते,  त्या (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या) निर्णया विरोधात पंजाब उच्च न्यायालयात अपील सुद्धा शासना तर्फे करण्यात आलेले नाही. तरीही मागील अनेक वर्षा पासून स्वा. सावरकरांना या हत्येत गोवण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न काही घटकां तर्फे करण्यात येत आहे. "गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी" या प्रा. शेषराव मोरे यांच्या पुस्तकात या पूर्ण खटलया विषयी आणि स्वा. सावरकर यांच्या बदनामी विषयी विस्तृत माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे सबळ पुरावे व योग्य संदर्भ या पुस्तकात दिले आहेत.


न्यायपत्रात स्वा. सावरकरांच्या विषयीचा निकाल पुढील प्रमाणे आहे, " त्यांच्यावर (वि. दा. सावरकर) आरोपपत्रात ज्या आरोपांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्या संबंधात ते दोषी आढळले नाहीत ( He is found 'not guilty') आणि त्यांना त्यातून निर्दोष ठरविण्यात येत आहे (acquitted thereunder). २०४ पृष्ठाच्या  निकालाच्या टंकलिखितात पृ. १७७ वर न्यायालय लिहिते, " वर सांगितल्याप्रमाणे विनायक दा. सावरकरां विरुद्ध फिर्यादी पक्षाची बाजू केवळ माफीचा साक्षीदार व  केवळ त्याच्या साक्षीवर आधारलेली आहे. वर हेही सांगितले आहे की, केवळ माफीदाराच्या साक्षीवर आधारून विनायक दा सावरकरां विरुद्ध काही निष्कर्ष काढणे धोकादायक ठरेल." याच टंकलिखितात न्यायालय २०/०१/१९४८ च्या बॉम्ब स्फोटात व ३०/०१/१९४८ च्या प्रत्यक्ष हत्येत स्वा. सावरकरांचा हात होता असे गृहीत धरण्याचे कोणतेही कारण नाही. तेव्हा न्यायालयाने स्वा. सावरकरांना निर्दोष ठरवताना 'पुरावा नसणे' ही जी मूलभूत कसोटी लागते, त्या आधारे निर्दोष ठरविले होते, संशयाचा फायदा घेऊन मुक्त केले नव्हते.

विरोधक ज्या कपूर आयोगाचा स्वा. सावरकर यांच्या बदनामी करिता विशेष उल्लेख करतात त्याविषयी थोडे, या आयोगाची नियुक्ती करण्यामागचे करणं म्हणजे, १९६४ रोजी या हत्येतील सहभागी व ज्यांनी जन्मठेपेची शिक्षा झाली होती असे गोपाळ गोडसे, विष्णू करकरे आणि मदनलाल पाहवा त्यांची शिक्षा भोगून सुटका झाल्यावर दि १२ नोव्हेंबर १९६४ रोजी पुणे येथे त्यांच्या चाहत्यांनी सत्कारासाठी सार्वजनिक पूजेचे आयोजन केले होते. या सत्कार व पूजेस केसरीचे माजी संपादक व तरुण भारत चे तेव्हाचे संपादक गजानन विश्वास केतकर अध्यक्ष होते त्यांनी आपल्या भाषणांत सांगितले की, गांधीजंच्या हत्येचा विचार चालू असल्याची पूर्वकल्पना त्यांना होती. त्याकरिता ते नथुराम गोडसे यांच्या शिवाजी मंदिर पुणे येथील जुलै १९४७ च्या सभेची आठवण करून देतात, त्यात " गांधीजी म्हणतात की, मी १२५ वर्ष जगणार आहे, होय पण त्यांना कोणी जगू दिले तर ना!" या वाक्याची आठवण करून देतात. या सभेस काँग्रेस चे कार्यकर्ते बाळू काका कानिटकर उपस्थित होते व यांच्या मार्फत त्यावेळेच्या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब गंगाधर खेर यांना पत्रा द्वारे कळवली होती. या वक्तव्य नंतर विधानसभेत व लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला व या प्रकरणाची अधिक चौकशी मागणी करण्यात आली, या कारण्यासाठी २२ मार्च १९६५ रोजी कपूर आयोगाची नेमणूक झाली. द कमिशन्स ऑफ इन्क्वायरी ऍक्ट १९५२ नुसार कामकाज करणे अपेक्षित होते, न की स्वा. सावरकरांच्या निर्दोषत्वा वर टिपण्णी करणे. कोणत्याही आयोगाची निर्मिती एखाद्या विशिष्ट् प्रकरणाची चौकशी साठी नेमला जातो, त्याला उच्चस्थरीय चौकशी करण्याचे अधिकार आहेत पण न्यायालय देतात तसे  देण्याचा अधिकार कोणत्याही आयोगाला नसतो. या आयोगाने सावरकरांना गांधी हत्येसाठी दोषी ठरवले, जे कि या आयोगाच्या कार्यक्षेत्रात नव्हते. आयोगाने स्वा. सावरकरांवर दोष ठेवला, या खटल्यातील एकमेव माफीचा साक्षीदार असलेल्या दिगंबर बडगे यांची चौकशी या आयोगाने केली नाही, आयोगाच्या कार्यकाळात दिगंबर बडगे ह्यात होते व ते मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस चाळीत राहायला होते. अशा महत्वाच्या व्यक्तीची चौकशी आयोगाने केली नाही.

गांधी हत्या व कोणतीही हिंसा याचे समर्थन मला करायचे नाही, पण स्वा. सावरकरांना या हत्येमध्ये गोवण्याचा खूप मोठा प्रयत्न झाला होता असे नक्की जाणवते.

 

धन्यवाद                                                                              विराज वि देवडीकर

 

 

(या लेख करिता चे संदर्भ "गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी" या पुस्तकातील आहेत)