Wednesday 26 February 2020

पतितपावन मंदिर आणि स्वा. सावरकरांची भूमिका



आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिवस त्यानिमित्याने त्यांनी १९२१ ते १९३७ या काळात रत्नागिरीत स्थानबद्ध असताना अस्पृश्यता निवारण्याकरिता विविध प्रकारे कार्य केले,  त्यामधील एक महत्वाचा टप्प म्हणजे पतितपावन मंदिराची निर्मिती होय. अस्पृश्यता निवारण आणि जाती व्यवस्थेचे उच्चटन करताना भारतीय सुधारकांच्या इतिहासात दोन गट पडलेले आपल्याला दिसून येतात. एक बोलके सुधारक आणि दुसरा गट कर्ते सुधारक, स्वा. सावरकर हे या कर्ते सुधारक गटातील एक सुधारक होते असे म्हणता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वा. सावरकर यांचे चरित्र लिखाण करणारे धनंजय कीर यांनी बाबासाहेबांच्या चरित्र ग्रंथात,"At best therefore, Gandhi was a reformer while Savarkar & Ambedkar were social revolutionaries. A reformer rebuilds the old structure. A revolutionary blows up the old building & build a new one"(पान ५९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लाईफ अँड मिशन) वरील अभिप्राय नोंदवलेला आहे. त्यांनी बाबासाहेबांना आणि सावरकरांना सामाजिक क्रांतिकारक(Social revolutionaries)  म्हटले आहे. १९२१ पूर्वीचे सावरकरांचे कार्य हे राजकीय क्रांतिकारकाचे होते तर १९२१ नंतर त्यांचे कार्य सामाजिक क्रांतिकारकाचे झाले पण हा सामाजिक क्रांतिकारक बोलका सुधारक नव्हता तर कर्ता सुधारक होता असे म्हणावे लागेल. त्यामुळेच त्यांनी समाजव्यवस्थेची जीर्ण आणि निरुपयोगी इमारत पडून नवीन बांधण्याचे कार्य हाती घेतले होते. या समाजव्यवस्थेची नवं निर्मिती करतांना चे महत्वाचे पाऊल म्हणजे  अस्पृशांना स्पृशांन प्रमाणे मंदिरातील गर्भगृहात जाऊन देव दर्शन घेण्याचा अधिकार मिळणे हे होते. बाबासाहेबांनी केलेला नाशिक मधील काळाराम मंदिर सत्याग्रह/आंदोलन हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. पतितपावन मंदिराची निर्मिती सुद्धा सावरकरांचा सनातनी लोका विरुद्धचा विद्रोहाचा होता.

या मंदिराच्या निर्मिती वरून सावरकरांची भूमिका, मंदिराचे कार्य आणि स्वरूप याबाबत त्याकाळी व आज सुद्धा अनेक समज-गैर समाज निर्माण केले गेलं, देवदर्शनाचा सर्वाना अधिकार आहे हे मान्य करतांनाच अस्पृशांचे नवीन मंदिर निर्मिती करून सावरकर स्पृश्य-अस्पृश्य यांच्यातील सामाजिक दारी वाढवत आहेत असा आरोप त्यावेळी आणि आज सुद्धा होताना दिसतो. सावरकरवाद्यांना जुनी मंदिरे व देवळे अस्पृशांना उघडी करणे टाळावे म्हणून नवीन मंदिराची निर्मिती किंवा अस्पृशांन साठी निर्माण केलेले मंदिर अशी टीका करताना अनेक विचारवंत दिसतात. या मंदिराच्या निर्मितीची थोडी पार्श्वभूमी पाहू, श्री भागोजी कीर नावाचे भंडारी जातीतील एक साधन गृहस्थ होते, शुद्र जातीतील असल्यामुळे शिवाच्या मूर्तीची पूजा त्यांना करता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी स्वःता चे भागेश्र्वराचे मंदिर बांधले. कीरांनी ही गोष्ट स्वा. सावरकरांना सांगितली त्यावर सावरकर त्यांना म्हणाले, " आपण धनवान, स्वतंत्र देऊळ बांधले; हे अस्पृश्य निर्धन, त्यांना देव नाही, देवालय नाही, देवदर्शन नाही."(१६७) कीर यांना त्यांनी उपदेश केला अस्पृशा वरील हा अन्याय दूर करावा म्हणून सर्व हिंदू करीता एक स्वतंत्र मंदिर आपण बांधावे व तो त्यांनी(कीर) मान्य केला. सावरकरांच्या सुचणे नुसार श्री भागोजी कीर आणि रत्नागिरी हिंदूसभा यांनी दि. १०/०३/१९२९ रोजी मंदिराची पायाभरणी डॉ कुर्तकोटी शंकराचार्य यांच्या हस्ते झाली. प्रत्यक्ष मंदिर पुढील दोन वर्षांनी म्हणजे १९३१ ला उभे राहिले. या मंदिराच्या निर्मिती पूर्वी किंवा निर्मिती नंतर वेगवेळया विचारवंतांनी पतितपावन मंदिरावर व स्वा. सावरकरांच्या वर टीका केली आहे. 
दि. १२/०४/१९२९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, "बहिष्कृत भारत" मध्ये स्फुट लिहून टीका केली. 'अस्पृशांसाठी खास देवालय' असे स्फुटाचे नाव होते.  या लेखात बाबासाहेब टीका करताना लिहतात, त्यांना बहिष्कृत वर्गासाठी वेगळ्या देवळाची गरज वाटत नाही, तसेच स्पृश्य-अस्पृश्य यांच्यातील भेद यामुळे कायम राहील असे वाटते. "रत्नागिरीचे नवीन देऊळ महारचांभारांचे देऊळ म्हणून मानले जाईल" असे भविष्य त्यांनी वर्तवले होते(१६८). पण या टीके मागे बाबासाहेबांना एक  कटू अनुभव १९२७ मधील मुंबईतील फणसवाडीतील सर्व हिंदूंकरिताच्या मंदिराचा होता असे वाटते(१७०). मंदिराच्या निर्मिती नंतर ९/०३/१९३१ च्या "जनता" च्या अंकात सुद्धा पतितपावन मंदिरावर व स्वा. सावरकरांवर टीका केलेली आढळते. 'जनता' कार स्वा.सावरकरांनी नवीन मंदिर बांधण्यात आपली शक्तीयुक्तीचा अपव्यय न करता जुनी देवळे सर्वांसाठी खुली करावीत अशी सूचना करते(१७१). डॉ. भालचंद्र फडके, डॉ. दिनकर हेरलेकर, डॉ गंगाधर पानतावणे हे सुद्धा पतितपावन मंदिर आणि स्वा. सावरकर यांच्या वर टीका करतात.(१८६) त्यामुळे या मंदिरा बाबत स्वा. सावरकरांचे मत सुद्धा जाणून घेणे महत्वाचे वाटते.
पतितपावन मंदिराच्या निर्मिती पासून हे मंदिर पूर्वास्पृशा सहित सर्व हिंदू साठी आहे हीच स्वा.सावरकरांची स्पष्ट भूमिका होती, व त्यासाठी त्यांनी आठ नियमांची नियमावली केली होती, उदाहरणा दाखल त्यातील काही पाहू. ) हे अखिल हिंदूमंदिर बांधण्यात माझा उद्देश सर्व हिंदू जनतेस जातिवर्णनिर्वीशेषपणे सांघिक पूजा-प्रार्थना करता येईल असे एक सार्वजनिक धर्मकेंद्र असावे  असा आहे. २) यास्तव पतितपावनाच्या देवळात कोणत्याही वर्णाच्या व जातीच्या हिंदूस तो जोवर खालील आणि इतर सर्वसामान्य व्यवस्थेचे नियम पाळेल पूजा-प्रार्थना-दर्शनास मज्जाव नसावा. यातील क्रं. ६) नियम काय सांगतो पहा, "देवाचा जो पुजारी नेमण्यात येईल तो त्या कार्यास सर्व दृष्टीने योग्य असेल तर हिंदूंतील पूर्वास्पृश्यांस सुद्धा कोणत्याही जातीचा असला तरी केवळ जातीभेदाच्या कारणासाठी त्यास हरकत घेतली जाणार नाही." यातील क्रं. ७) नियम सुद्धा खास होता "वर नियम १. मध्ये दिलेल्या उद्देश पूर्तीस्तव केलेले वरील मूलभूत नियम, यापुढे मला स्वतःला, माझ्या वारसांना किंवा मी जो पंच नेमीन त्यांना किंवा इतर कोणालाही आणि केव्हाही बदलता येणार नाही." (१६८). मंदिराच्या विश्र्वस्त मंडळात इतर हिंदू सोबत पूर्वास्पृश्याचाही समावेश होता. "बहिष्कृत भारत" मधील केलेल्या टीकेनंतर  सुमारे एक महिन्यांनी दि १८.०५.१९२९ रोजी स्वा. सावरकरांनी," रत्नागिरीच्या पतितपावनचे मंदिर सर्व हिंदूंसाठी आहे, केवळ अस्पृश्यांसाठी नाही" असा लेख 'बळवंत' मध्ये लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केली(१७२). यात त्यांनी समकालीन अनेक टीकाकाराना उत्तर दिले तसेच आपली भूमिका स्पष्ट केलेली दिसते.  समाज पूर्ण बुद्धिवादी बनवणे हे सावरकरांच्या अस्पृश्यता निवारण्याचे सूत्र म्हणावे लागेल, त्याकरिता भजन-कीर्तने आगोदर अस्पृश्य वस्त्यात घेणे नंतर स्पृश्य वस्त्यात, भाषणांच्या आणि सभेच्या ठिकाणी आधी स्वतंत्र बसने नंतर सरमिसळ बसने, गणेशउत्सवात पूर्वास्पृशांसाठी स्वतंत्र आणि मिश्र  मेळावे हा पहिला टप्पा नंतर अखिल हिंदू मेळा हा एकत्र स्पृश्य-अस्पृश्य मेळावा, मंदिर प्रवेशाचा ही असाच प्रकार सत्यनारायण- गणेशउत्सवात आधी देवाची बाटवाबाटवी करणे नंतर पूर्वास्पृशांना जुन्या मंदिराच्या पायरी पर्यंत आणणे, सभा मंडपात जाणे तिसरा टप्पा, नवी अखिल हिंदू देवालये चौथा टप्पा, सारी जुनी मंदिरे उघडणे पाचवा टप्पा. या टप्प्यातून स्वा. सावरकर अस्पृश्यतेवर बुद्धिवादी घाव घालत होते. पतितपावन मंदिर निर्मिती याच अस्पृश्यता/जातीभेद संपवण्याचा महत्वपूर्ण भाग होता. 

 दि. ३०/०९/१९३१ रोजीच्या टाइम्स ऑफ इंडिया ने या मंदिरातील एका घटनेची दाखल घेतली आहे, " रत्नागिरी येथे अखिल हिंदूंना देवदर्शनासाठी खुले असलेल्या वीर सावरकर निर्मित पतितपावन मंदिरात भंगी जातीच्या बुवांनी कीर्तन करावयाचे व उच्चवर्णी हिंदूंनी त्यांचे गळ्यात हार घालून त्यांच्या पायावर डोके ठेवायचे ही आजवर कधीही न पडलेली प्रथा पडून सावरकरांनी महान क्रांती केली आहे." पुण्याच्या ब्राम्हणेतर 'विजय-मराठा' ने याबद्दल सावरकरांचे आणि रत्नागिरीच्या नागरिकांचे अभिनंदन केले.(१७६) हा कार्यक्रम स्वा. सावरकरांनी काही खास कारणांनी केला होता. दि १९/०९/१९३१ ला  'भंगी बुवांच्या कीर्तनाचा आणि महाराच्या गीता पाठ' चा कार्यक्रम गणेशोत्सवा निमित्याने रात्रीचा आयोजित केला होता. यावेळी रत्नागिरीतील सर्व स्पृश्य-अस्पृश्य समाज एकत्रित सभा मंडपात बसलेले असताना कीर्तन व गीता पाठ नंतर स्वा. सावरकरांच्या सुचणे वरून त्या दोघांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन लक्ष्मी-नारायणाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.(१८३) या कृतीमुळे उपस्थित स्पृश्य-अस्पृश्य नागरिकांना हा स्पष्ट संदेश गेला की, पतितपावन मंदिर हे अखिल हिंदू समाजाचे मंदिर आहे व या मंदिरात स्पृश्य-अस्पृश्यता न मानता सर्व स्त्री पुरुषांना देवाचे दर्शन मंदिरात येऊन घेण्याचा अधिकार आहे. ही घटना सामान्य मानताच येणार नाही, त्यावेळेसच्या प्रस्थापित समाज व्यवस्थे नुसार समाज क्रांतीच होती आणि या समाज क्रांतीचे क्रांतीकारक स्वा. सावरकर होते.
या प्रकारे स्वा. सावरकरांनी अस्पृश्यता आणि जाती व्ययस्था निर्मूलना साठी मूलभूत कार्य केले. रत्नागिरीत स्थानबद्ध असतांना त्यांनी या प्रकारचे अनेक क्रांतिकारक उपक्रम केलेले दिसतात. बुद्धिवादी विचारातून जातिव्यवस्थेच्या मुळावर त्यांनी आघात केला. प्रस्थापित सनातनी लोकांच्या विरुद्ध त्यांनी पुकारलेला विद्रोह होता.

"जे भक्तांचे कैवारी! बाबा आंबेडकर, सावरकर, कीर!!
तेच आमचे साह्यकरी! त्यांनी रत्नागिरीतच आम्हा दाविली पंढरी!!
म्हणे गंगाराम समस्त जाति! पतितपावनाची लागली भक्ती! आता सोडा सगळी भ्रांती!!"
(रत्नागिरी जिल्हा सोमवंशी महार परिषद जाहिरात 'बलवंत' दि. २६/०४/१९३१)

वंदे मातरम                                                                                      विराज 

(वरील लेखातील संदर्भ प्रा. शेषराव मोरे यांचे "सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग" हे पुस्तक आहे.)