Showing posts with label IndiaAt75. Show all posts
Showing posts with label IndiaAt75. Show all posts

Tuesday, 10 May 2022

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी

 

#चष्म्यातून_इतिहास, #१८५७चे_स्वातंत्र्यसमर, #वीर_सावरकर

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी आजच्या दिवशी, १० मे १८५७ साली पडली,

 

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी विरुद्ध भारतीय जवानांनी पुकारलेल्या लढ्याला आज १६५ वर्ष पूर्ण झाली. "शिपायांचे बंड" म्हणून ब्रिटिश व डाव्या विचारसरणीने  हिणवले गेलेल्या स्वातंत्र्य संग्रामाला सणसणीत चपराक म्हणून वीर सावरकरांनी हे `बंड' नव्हे, तर भारताचे पहिले `स्वातंत्र्ययुद्ध' होते, हे ऐतिहासिक पुराव्यांसह सप्रमाण सिद्ध केले. हुतात्मा मंगल पांडे, नानासाहेब पेशवे, तात्या टेपे या सारख्या असंख्य वीरांनी कंपनी सरकारला सशस्त्र विरोध केला होता. त्यावेळेसच्या भारताच्या वेगवेगळ्या भागात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या प्रदेशात युद्धाचा भडका उडाला, मेरठ येथील लष्कराच्या छावणीत भारतीय सैनिकांनी बंड केले. मेरठ छावणी उत्तर भारतातील सर्वात महत्वाची आणि मोठी छावणी होती, या छावणीत देशी शिपाई व गोरे सैनिक जवळपास समप्रमाणात होते. 


कंपनीने आणलेल्या नव्या हातबॉम्बची प्रात्यक्षिके ९ मे १८५७ रोजी दाखवण्यात आली.  असे हातबॉम्ब हाताळण्यास बहुतांश हिंदी शिपायांनी असहमती दर्शवली. त्यामुळे संतापलेल्या गोऱ्या सार्जंटने त्यांची वर्दी उतरवली व त्यांची अपमानासपद धिंड काढली. त्यांचे तातडीने कोर्टमार्शल करण्यात आले व त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. यामुळे कमालीची अस्वस्थता पसरली. दुसऱ्या दिवशी, १० मे रोजी रविवार होता. अनेक गोरे अधिकारी कुटुंबियांसहीत चर्चमध्ये वा बाजारहाटीला गेले होते. तीच वेळ साधून हिंदी शिपायांनी उठाव केला व छावणीतील गोऱ्या सैनिकांवर हल्ला करुन तुरुंगात डांबलेल्या अनेक शिपायांना मुक्त केले. नंतर त्यांनी बाजाराकडे कूच करुन तिथेही गोऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसह चोप दिला.

हा उठाव पाहून नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, बहाद्दुरशहा जाफर, राणी लक्ष्मीबाई या व अशा वीरांनी अनेक ठिकाणी कंपनी सरकार विरुद्ध युद्ध पुकारले. हा लढा पुढे वर्ष भर वेगवेळ्या लढयातून सुरु राहिला पण यशस्वी होऊ शकला नाही. या उठावा मुळे कंपनी सरकारचा कारभार जाऊन भारतातात ब्रिटनच्या राणीचे साम्राज्य आले. या उठावा मुळे ब्रिटिश राज्यकर्ते भारतीय समाजा बद्दल व समाज व्यवस्थेबद्दल अधिक जगरुक झाले. हाच उठाव त्यानंतरच्या भारतीय स्वातंत्र्या करिताच्या अनेक लढायांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यातून लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, वीर सावरकर या सारख्या प्रमुख नेत्याबरोबरच चापेकर बंधू, भगत सिंह, सुखराम, राजगुरू, कान्हेरे खुदिराम बोस असे क्रांतिकारक पुढे आले व ९० वर्षांच्या लढ्यानंतर भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला.


या लढ्यात महाराष्ट्रातील औंध संस्थानाने सहभाग घेतला व कंपनी सरकार विरुद्ध लढा दिला, दक्षिण भारतात इतरत्र हा उठाव झालेला दिसत नाही, बंगाल या उठावा पासून अलिप्त राहिले तर पंजाब कंपनी सरकारच्या समर्थनात उतरले. त्यामुळे लोकमान्यांनी या उठावाचे वर्णन करताना "हिंदुस्थानी वेगवेगळे लढले म्हणून हरले" अशा प्रकारे केले आहे. 

विराज वि देवडीकर

 

Saturday, 2 October 2021

गांधीजी

 #वर्षाचा_दिवस_२७५वा

परवा गांधी जयंती निमित्याने मुलीला भाषण लिहून देत होतो, तेव्हा माझ्या लहानपणीची आठवण झाली. लहानपणी शाळेत असताना गांधीजी म्हटलं कि अनेक टवाळखोर पोर "म्हतारा, टाकल्या, दात पडका" म्हणून संबोधायची, ते बालबोध दिवस होते पण जस जसा मोठा झालो तस तस बोध व्हायला सुरवात झाली आणि गांधी या चरित्राची ओळख झाली. ऍग्रीकल्चर ला बीड ला आल्यावर गांधी जींचं आत्मचरित्र "माझे सत्याचे प्रयोग" हे पुस्तक वाचले आणि गांधी जी शी नव्याने ओळख झाली. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वचा महत्वाचा पैलू म्हणजे त्यांचे सामान्य पण होते, त्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यावर आपल्याला हे जाणवते. गांधीजी याच सामान्य पणा मुळे असामान्य व्यक्तिमत्व बनले असे म्हणता येऊ शकते. हा सामान्य पणा त्यांच्या लहानपणा पासून त्यांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या घटनां मध्ये दिसून येतो. बालपण, शिक्षण, लग्न, उच्च शिक्षण या मध्ये हा सामान्य पणा स्पष्टपणे जाणवतो. गांधीजींनी वैयक्तिक आयुष्यातील अनेक चुका स्वीकारल्या आणि स्वतःच्या आत्मचरित्रात मांडल्या सुद्धा, त्यांचे आत्मचरित्र वाचताना आपल्याला हे विशेष जाणवत राहते.  या सामान्यपणातूनच त्यांच्यात तत्वनिष्टता निर्माण झाली असे म्हणता येऊ शकते, गांधीजी प्रचंड तत्वनिष्ठ होते आणि त्यांनी वैयक्तिक व राजकीय आयुष्यात ती तत्वे तेवढ्याच निष्ठेने पाळली. 


भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामान्य भारतीयांना जोडण्याचे काम गांधीजींनी केले, स्वातंत्र्य लढ्यातील अनेक प्रसंग असे आहेत ज्यामुळे सामान्य भारतीय या लढ्याशी जोडला गेला, ज्यात असहकार आंदोलन असेल, मिठाचा सत्याग्रह असेल किंवा चले जावं चळवळ असले. सामान्य भारतीय या प्रकारच्या लढ्यातून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढू शकला. उपोषण, मौन, असहकार, स्वदेशी या सामान्य आंदोलना मुळे सामान्य भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तर उरलाच पण स्वातंत्र्य लढ्याची चेतना भारत भर पोहंचवण्यास मदत झाली, या सर्व आंदोलनाची व्याप्ती भारत भर झाली आणि ते त्यांचे असणारे सामान्य स्वरूप आणि सर्व सामान्य लोकांचा सहभाग. १९१६ साली चंपारण्यातील निळं उत्पादक शेतकऱ्यांचा लढा गांधीजींच्या नेतृत्वा खाली लढला गेला व यशस्वी झाला, हा गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह ज्यामुळे सामान्य भारतीय लोकांना गांधीजींची ओळख झाली. गांधीजींचं नेतृत्व असामान्य होत हे निर्वीवादीत सत्य आहे. गांधीजींनी भारतीय सामान्य जणांना व्यवस्थित जाणलं होते, सामान्य भारतीयांना जोडल्याशिवाय भारताचे स्वतंत्र शक्य नाही याची जाण गांधीजींना नक्कीच होती. सामान्य लोकांच्या मध्ये रमणारे नेतृत्व गांधीजींचे होते.गांधीजींच्या नेतृत्वाची भुरळ आज सुद्धा असंख्य भारतीयांच्या मनावर आहे. अनेक सामान्य घटनांतून गांधीजींनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले. टिळकांच्या निधना नंतर नेतृत्वहीन झालेला भारतीय स्वातंत्र्यलढ्याला गांधीजींनी नेतृत्व तर दिलेच पण स्वरूप सुद्धा दिले. सामान्य भारतीय मनाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडण्यासाठी गांधीजींनी अर्ध नग्न असणाऱ्या सामान्य लोकं प्रमाणेच गांधीजींनी स्वतःचा वेष केला व तो आयुष्यभर जपला. 


गांधीजींची हिंदू धर्मा वरती निष्ठा होती आणि हिंदू संस्कृतीवर त्यांचा दृढ़ विश्वास होता. गांधीजींच्या दैंनंदिन आयुष्यातील अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील ज्यामुळे त्यांची हिंदू धर्मा वरील श्रद्धा स्पष्ट होते. या द्वारे सुद्धा गांधीजींनी स्वतःला सामान्य भारतीयांशी जोडले होते व त्याचा उपयोग भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी करून घेतला.

गांधीजींच्या राजकीय विचारांशी आक्षेप असू शकतात, सक्षम लोकशाही पद्धतीत ते स्वीकारले पाहिजेत. माझ्या सहित अनेक जण त्यांच्या राजकीय मतांशी सहमत नसतील पण जगातील अनेक विचारवंत, राजकीय नेते, सामाजिक कार्यकारते, उद्योग व इतर क्षेत्रातील प्रतिभावंत आज सुद्धा गांधीजींना प्रेरक मानतात ते त्यांच्या सामान्यपणा मधून निर्माण झालेल्या सर्व व्यापी नेतृत्वाला.

आज गांधीजींच्या १५२ व्या जयंती निमित्याने त्यांना विनम्र अभिवादन

 

विराज विजयकुमार देवडीकर